महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांचे विद्यापीठ गेटसमोरील आंदोलन मध्यस्थीनंतर तात्पुरतं स्थगित

राहुरी विद्यापीठ : कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त उपोषण कर्त्यांना ज्युस देऊन उपोषण सोडविताना माजी खा. तनपुरे व रावसाहेब खेवरे.

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठ सेवेत तात्काळ सामावून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण (गुरुवारी) सायंकाळी माजी खासदार प्रसाद तनपुरे व शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते मागे घेण्यात आले.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याशी तनपुरे व खेवरे यांनी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. अधिवेशन संपल्यानंतर आठवडाभरात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन, कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन खेवरे व तनपुरे यांनी उपोषण कर्त्यांना दिले आहे.

राहुरी येथे कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ अठरा प्रकल्पग्रस्त अन्नत्याग करून, उपोषणाला बसले होते. त्यांच्या समवेत शंभरावर अधिक प्रकल्पग्रस्त साखळी उपोषण करीत होते. तीव्र उष्णतेमुळे उपोषणकर्ते जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे अक्षय काळे, नारायण माने, किशोर शेडगे, गणेश सरोदे, शुभम साळवे यांची प्रकृती खालावली. तरी, त्यांनी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. दुपारी दोन वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, उपोषणकर्ते सम्राट लांडगे, संतोष पानसंबळ व इतरांनी कृषि विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून त्यासमोर होळी पेटविली. कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करून होळीच्या समोर बोंबा ठोकल्या.

सायंकाळी पुन्हा तनपुरे व खेवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. अधिवेशनानंतर बैठकीत तोडगा निघाला नाही. तर, चार एप्रिल नंतर पुन्हा उपोषण सुरू केले जाईल. असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. त्यावर बोलतांना म्हणाले, "प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नावर बैठकीत तोडगा निघाला नाही. तर, पुढच्या उपोषणात मी सहभागी होईल. प्रश्न सुटत नसेल तर प्रकल्पग्रस्त आपापल्या जमिनी ताब्यात घेऊन, नांगरट करण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल. या आंदोलनात पुढाकार घेईल." अशी ग्वाही खेवरे यांनी दिली.
आश्रूंचा बांध फुटले...
       चार दिवसांपासून अन्नपाण्याविना आमची मुले उपोषणाला बसली आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांच्या जीवाची कासावीस पहावत नाही. वडील कुठे गेलेत असे नातवंडे विचारत आहेत. शासनाला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडा. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा. अशी आर्त विनवणी मीराबाई लांडगे यांनी माजी खासदार तनपुरे यांना केली. यावेळी त्यांच्यासह उपस्थित महिलांना आश्रू अनावर झाले.
उपोषणस्थळी तनपुरे यांनी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांना बोलावून "कृषी विद्यापीठाने शासन दरबारी युद्धपातळीवर पाठपुरावा करावा. ठेकेदारीवर काम देतांना स्थानिकांना प्राधान्य द्यावे." असे सांगितले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या