राहुरी शहर / अशोक मंडलिक – मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी दि.२६ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. आज तीन दिवस होवून देखील सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीराजे यांचे स्वास्थ खराब होत चालले आहे. या विषयास अनुसरून मराठा एकीकरण समितीच्या गाव सदस्यांची बैठक राहुरी येथे संपन्न झाली. बैठकीत उद्या, मंगळवार दि.१ मार्च रोजी मार्केट यार्ड समोर नगर – मनमाड रोडवर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या होणाऱ्या आंदोलनात राहुरी तालुक्यातील गाव खेड्यातील सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीस मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, रविंद्र निमसे, सोमनाथ धुमाळ, मुकुंद निमसे, अण्णासाहेब तोडमल, सुभाष जुंदरे, निखील कोहकडे, गाडे रामेश्वर, सुनिल निमसे, सुनिल चौधरी, किशोर कोबरणे, भाऊराव कवडे, किशोर सोनवणे, दुशिंग अनिल, संभाजी शिरसाठ आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर मराठा एकीकरण समितीच्या वतीने रास्ता रोकोचे निवेदन तहसिलदार श्री.शेख व पो.नि.दराडे यांना देण्यात आले आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलन होत असल्याने आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी हि शासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.