संगमनेर /बाळासाहेब भोर - ऐतिहासिक व नैसर्गिक वैभव प्राप्त स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीचा दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार आता नियमित सुरु झाला आहे.

एकेकाळी संगमनेर तालुक्यातील मोठी बाजारपेठ व पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडे बाजार होता. परंतु कोरोनासारख्या राष्ट्रीय महामारीमुळे गेली अनेक दिवस हा बाजार बंद होता. आता मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाल्यामुळे बाजार नियमित सुरु झाला आहे.

पूर्वीपासूनच पेमगिरीचा पंचक्रोशीत मोठा बाजार भरत असे. कारण पेमगिरी, निमगाव पागा, नांदुरी दुमाला, सावरचोळ, पिंपळगाव माथा, लहित, लिंगदेव, धुपे - शिरसगाव या गावातील लोकांची येथे नेहमीच वर्दळ असते. अनेक दिवस बंद असलेला आठवडे बाजार पूर्ववत सुरु झाल्याने शेतकरी, व्यापारी, दुकानदार यांना दोन पैसे मिळणार आहेत व नागरिकांनाही ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे.