अहमदनगर

मानवता धर्म मानून काम केल्यास समाजात सहिष्णूता वाढीस लागेल- नगरसेवक संपतराव बारस्कर

राहुरी / बाळकृष्ण भोसले – जातीधर्मा पेक्षा मानव धर्म मोठा मानून काम केले तर समाजामध्ये सहिष्णूता वाढीस लागेल, समाज एकसंघ राहू शकेल, त्यासाठी साहित्याचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन अहमदनगर मनपा चे विरोधी पक्ष नेते संपतराव बारस्कर यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सुनील गोसावी संपादित अनाथांची माय प्रातिनिधिक लेख व काव्य संग्रह प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी विचारपिठावर ज्ञानदेव पांडूळे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कवीवर्य चंद्रकांत पालवे, राजेंद्र चोभे, वॉरियर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.बारस्कर म्हणाले की, शब्दगंध परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजन वर्गातील नवोदित साहित्यिकांसाठी हक्काचे विचारपीठ उभे केले, अशा साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेसोबत जोडून घ्यायला मला नक्कीच आवडेल. माझ्या कर्मभूमीत वॉरियर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातील पुर्व प्राथमिक शिक्षण सेवा सुरू झाली आहे. त्याचाही मला मनस्वी आनंद होत आहे. आगामी काळात मी आपणास सर्वतोपरी सहकार्य करील. असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना चंद्रकांत पालवे म्हणाले कि, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्या बद्दलच्या आठवणींवर आधारित प्रातिनिधिक स्वरूपाचे लेख व कवितां या संग्रहामध्ये आहेत. या कार्यात सहभागी होण्याची संधी शब्दगंध प्रकाशनच्या माध्यमातून लेखक कवींना उपलब्ध करून दिली ही कौतुकास्पद बाब आहे. यानिमित्ताने ‘अनाथांची माय’ सिंधूताई सपकाळ त्यांच्या कार्या बरोबरच आठवणींना उजाळा मिळाला आहे. पुस्तकाच्या रूपाने हा ठेवा चिरकाल स्मरणात राहील. यावेळी ज्ञानदेव पांडूळे, राजेंद्र चोभे, राजेंद्र उदागे, दशरथ खोसे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी झालेल्या काव्य संमेलनात संगीता दारकुंडे, गायत्री भोराडे, बाळासाहेब अमृते, कृष्णकांत लोणे, तात्याराम राऊत, सुनीलकुमार धस, राजेंद्र फंड, राजेश सटाणकर, बबनराव गिरी, कृष्णा अमृते, बालकवी समर्थ दारकुंडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. संस्थापक सुनील गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यवाह सुभाष सोनवणे यांनी प्रास्तविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर खजिनदार भगवान राऊत यांनी आभार मानले.
कार्यक्रमास अमोल भोराडे, प्रशांत सुर्यवंशी, शर्मिला रूपटक्के, वैभव चोपडे, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, पॉल भिंगारदिवे, मंदा पौळ, संजय घोरपडे, मकरंद घोडके, गुजर काका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश राऊत, हर्षली गिरी व दिशा गोसावी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button