ठळक बातम्या

दूध भेसळीची लागलेली कीड समुळ नष्ट करणार – राधाकृष्ण विखे पाटील

महएक्सपोचा फायदा पशुपालकांना - खा. डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी : दूध भेसळीचे प्रकार हे मोठ्या प्रमाणावर समोर येत असून या बाबत शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. असे भेसळीचे प्रकार कुठे आढळून आले तर तात्काळ टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महापशुधन एक्स्पो या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास खा.डॉ.सुजय विखे पाटील,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कुलगुरू शरद गडाख, जिल्हाधिकारी सालीमठ, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नगर दक्षिण भाजपा अध्यक्ष अरुण मुंडे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महापशुधन एक्स्पोच्या माध्यमातून शेतकऱ्यास तसेच पशुपालक यांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येते या बाबत माहिती मिळते. शिवाय विविध प्रजातीचे पशू पक्षी यांचे संगोपन कशा पद्धतीने करावे याबाबत ज्ञान मिळते. जेणेकरून होणारे नुकसान टाळून शेती पूरक व्यवसाय यशस्वी करता येईल. राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही सातत्याने दूध भेसळ याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत, त्यावर आम्ही कडक कारवाई देखील केली आहे, अजूनही कुठे असे प्रकार होत असतील तर याबाबत टोल फ्री नंबर वर तात्काळ तक्रार करावी, आम्ही लगेच कारवाई करू असे त्यांनी सांगितले.

पशूंच्या देशी वाणाचे संवर्धन करण्यासाठी आमचा विभाग सातत्याने प्रयत्नशील असून या करिता अधिकारी तसेच तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देखील आम्ही घेत आहोत, याकरिता अशा महाएक्सपोची मदत होते असे त्यांनी सांगून लम्पी संसर्गात आम्ही राज्यातील दीड कोटी पशुंचे मोफत लसीकरण केले आणि आता कायम स्वरुपी लसिकरणासाठी याची लस निर्माण देखील करण्याचे काम सुरू आहे असे सांगितले. राज्यात गोसेवा आयोगाच्या माध्यमातून पशू संवर्धन व संशोधन यास प्राधान्य देणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून विखे पाटील यांच्याकडे सर्वांची लगाम आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात सर्व काही ठीक सुरू आहे. मागील सरकार मध्ये राज्यमंत्री असताना विखे यांच्या सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे तत्कालीन मुख्यमंत्र्याना पटत नव्हते, मला वेळोेवेळी त्या बाबत टोकत होते. मात्र आमची मैत्री ही कायम ठेवली असे सांगून अशा सगळ्या गोष्टी एकत्र येवून राज्यात सत्तांतर झाले. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही शेतकरी, पशुपालक तसेच सर्वांसाठी महत्वाचे निर्णय घेतले, आता गारपीट झाली असून पंचनामे झाले आहेत. मदतीची घोषणा करून एक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे यावेळी सत्तार यांनी सांगितले.

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाएक्सोचा फायदा पशुपालकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. देशाच्या १२ राज्यातून ८९ विविध प्रजातीचे पशू प्रदर्शनासाठी आले आहे, हे सर्व आपल्याला पहावयास मिळणार आहे. याचा आनंद आपण घ्यावा. तीन दिवसांत या महाएक्सपोत विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत याचाही लाभ घ्यावा.

या कार्यक्रमात पशुसंर्धन विभागाने पशुपालन बाबत तसेच विविध प्रजातीची माहिती डायरीत एकत्रित करून या डायरीचे विमोचन यावेळी करण्यात आले. महाएक्सपो कार्यक्रमास शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button