ठळक बातम्या

जलजीवन कार्यक्रमांतर्गत बु-हाणनगरसह ४२ गावे पाणीयोजनेसाठी १९५ कोटींवर निधीला प्रशासकीय मान्यता – आ. तनपुरे

राहुरी | बाळकृष्ण भोसले – नगर तालुक्यातील बुर्हाणनगर सह ४२ गावातील पाणी योजनेसाठी १९५ कोटी ७४ लाख ९७ हजार खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती मा. राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील मुळा धरणातुन थेट बुर्हाणगरसह ४२ गावे पाणीपुरवठा योजनेकरीता महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दि.२६ जुलै २०२२ रोजी तांत्रिक मान्यता दिली होती. या पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार तनपुरे यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा अधिकार्यांची दि. ३० जुलै २०२१ ते १८ जुन २०२३ पर्यंत तब्बल १० वेळा बैठका घेऊन या योजनेत येणार्या अडीअडचणीवर मात करत ही योजना सुरळीत कशी चालेल यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला होता.
तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांचकडे मुंबई येथेही मंत्रालय स्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. या योजनेत मतदार संघातील बहिरवाडी, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपुर, मांजरसुंबा, ससेवाडी आदी गावांचा नव्याने आराखडा तयार करुन समावेश करण्यात आलेला आहे. 
आ. तनपुरे पुढे म्हणाले की, या योजनेतील मांजरसुंबा, डोंगरगण, पिंपळगांव माळवी, जेऊर, इमामपुर, शेंडी, पोखर्डी, धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, पिंपळगांव उज्जैनी, आढाववाडी, वडगांव गुप्ता या गावांकरीता स्वतंत्र फिडर करण्यात आले आहे. या फिडरमुळे मोठ्या गावांना पाईपलाईनमुळे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या अनेक पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या असुन काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरवातही झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत जनतेच्या मुलभुत गरजांच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. बु-हाणनगर व ४२ गावे पाणी पुरवठा योजना उत्कृष्ठ प्रकारची नव्याने करुन पाणी प्रश्न मार्गी लावल्याने आ. तनपुरे यांचे नगर तालुक्यातील लाभार्थी गावातील जनतेने आभार व्यक्त केले आहे. 

Related Articles

Back to top button