अहमदनगर

खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जखमी; रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे प्रवासी हैराण

आंबी : निकृष्ठ कामामुळे आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याची झालेली दुरवस्था तर दुसऱ्या छायाचित्रात अपघाताने नुकसानग्रस्त रिक्षा. (छाया : संदिप पाळंदे)
आंबी : राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावरील सरई परिसरात खड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक प्रशांत किसन भिंगारदिवे, ताराबाई फकिरा पवार, मच्छिंद्र दादा मगर व इतर दोन असे पाच जण गंभीर जखमी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्व प्रवासी आंबी-अंमळनेर येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी येत होते.
अवघ्या सहा ते सात महिन्यांपूर्वी आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येते. काम पूर्ण होताच अवघ्या काही दिवसांतच या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली होती. तसेच रस्ताही ठिकठिकाणी खचला आहे. नियमाप्रमाणे एक वर्षापर्यंत रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र ‘सो-धा’मुळे-धा’मुळे यावर बोलायला कोणी तयार नाही. या खड्यांमुळे या भागात अनेक छोटे अपघात नित्याचे झाले आहेत. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण यांना याच खड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी एका स्थानिक ‘सोशल मीडिया’ समूहावर सदर रस्त्याच्या निकृष्ठ कामाची बातमी वृत्तपत्रात झळकणार अशी पोस्ट व्हायरल होताच ठेकेदाराने लगबगीने खड्डे दुरुस्ती करण्याची तत्परता दाखवली. मात्र पुन्हा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे झाली. या निकृष्ट कामाची चौकशी करून संबधित ठेकेदारावर व त्याला पाठीशी घळणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
“निकृष्ठ प्रतीच्या कामामुळे शासनाचा लाखोंचा निधी खड्ड्यात गेला. अपघातामुळे जीवितहानी झाली असती तर त्यास जबाबदार कोण? टक्केवारी घेऊन सुस्तावलेले प्रशासन बळी गेल्यावर जागे होणार आहे का? आठ दिवसांत रस्त्याचे खड्डे न बुजवल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन केले जाईल.”
संजय संसारे (तालुकाध्यक्ष – भारत मुक्ती मोर्चा)

Related Articles

Back to top button