अहमदनगर

इतर भाषांचा सन्मान राखून मराठी भाषेचे संवर्धन करायला हवे – डॉ शिवाजी काळे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मराठी भाषेचे संवर्धन करणे म्हणजे इतर भाषांचा तिरस्कार करणे नव्हे तर त्यांचा सन्मान राखून मराठी भाषेची महती वाढवणे होय, असे मत डॉ. शिवाजी काळे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश, श्रीरामपूर अभिजीत नांदगावकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायालयातील अन्य न्यायाधीश उपस्थित होते.
मराठी भाषेचे प्राचीनत्व व इतिहास विविध दाखले देऊन स्पष्ट करतानाच भाषा संवर्धनासाठी आजवर झालेल्या प्रयत्नांचा आढावा डॉ शिवाजी काळे यांनी घेतला आणि आजच्या पिढीची या संदर्भातील जबाबदारी स्पष्ट करून मातृभाषा म्हणून तिचे संवर्धन मुलाचे कर्तव्य या भावनेतून झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतात न्यायधीश अभिजीत नांदगावकर यांनी न्यायालयीन कामकाजातील मराठी भाषेचे महत्त्व सांगून मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश डी. पी. कासट यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड. सौ. एस.पी. गर्जे यांनी केले तर वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. समीर बागवान यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button