ठळक बातम्या

इंद्रधनुष्य म्हणजे स्वतःमधील आत्मविश्वास वाढविण्याचे व्यासपीठ – महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

राहुरी शहर | अशोक मंडलिक : इंद्रधनुष्य-२०२२ या महोत्सवाचे व्यासपीठ युवकांसाठी फार महत्वाचे आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वतःचे कलागुण व्यासपीठावर दाखविण्याची संधी मिळते. तसेच स्वतःमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यासपीठ मिळते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे इंद्रधनुष्य-२०२२ हा १८ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन दि. ५ ते ९ नोव्हेंबर, २०२२ कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोणेरे ता. माणगाव, जि. रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, दत्तात्रय उगले, तुषार पवार, दत्तात्रय पानसरे, इंद्रधनुष्य 2022 चे समन्वयक व माजी राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रमोद पाब्रेकर, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की, कृषि विद्यापीठांनी जगातील पहिल्या पन्नासमध्ये असणार्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करावेत. कृषि क्षेत्रातील सर्व महत्वाच्या स्टार्टअपमधून उर्जा देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. यातील तंत्रज्ञान लोकांनी स्वीकारले पाहिजे. तुमचे, तुमच्या कुटुंबाचे व समाजाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून ते पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपली पूर्ण ताकद लावून निश्चित केलेले ध्येय कठोर परिश्रम करुन साध्य करा. राहुरी कृषि विद्यापीठाने संपूर्ण देशामध्ये जास्त बियाणे तयार करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याचबरोबर देशामधील पहिले ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. देशी गाय संवर्धनाचा प्रकल्प पुणे येथे सुरू झालेला असून असून वेगवेगळ्या देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशुन म्हणाले की आपले ध्येय सुरुवातीलाच निश्चित करा व ते पुर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, आनंदात जगा व आपल्या मस्तीत रहा. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही करत असलेली मेहनतच तुम्हाला यशापर्यंत घेवून जाईल. जो स्वतःला ओळखतो तोच जगात यशस्वी होतो असा कानमंत्र त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. डॉ. प्रमोद रसाळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी इंद्रधनुष्य स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. कारभारी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी इंद्रधनुष्य-२०२२ या माहितीपुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी कवितेच्या स्वरुपात आभार मानले. सूत्रसंचालन सौ. विणा दिघे यांनी केले. या युवक महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील २१ विद्यापीठांमधील ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झालेले आहेत. पाच दिवस चालणार्या या युवक महोत्सवात हे विद्यार्थी वेगवेगळ्या 28 इव्हेंटद्वारे त्यांचा कलाविष्कार सादर करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी विद्यापीठ कार्यकारी सदस्य ॲड. तान्हाजी धसाळ, नामदेव ढोकणे, ॲड. सुभाष पाटील, कृषिभूषण सुरसिंग पवार, रावसाहेब तनपुरे तसेच राजभवनातील डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. संतोष परचुरे, डॉ. वाणी लातुरकर, डॉ. विठ्ठलराव नाईक व डॉ. चितोडे तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. साताप्पा खरबडे हे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button