अहमदनगर

अखेर लांबे यांच्या मागणीला यश; अहमदनगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल

राहुरी – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपासुन ते ०१ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत अहमदनगर-मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
राहुरी येथिल सामजिक कार्यकर्ते तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी नगर-शिर्डी रस्त्यावरील अवजड वाहतूक रस्ता दुरुस्त होई पर्यत बंद करावी अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. पत्रात लांबे यांनी म्हटले होते कि, २०१९ वर्षा पासून आम्ही नगर ते शिर्डी रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती लढा देत आहोत. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे शेकडो अपघात झालेले आहेत. शेकडो अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तसेच शेकडो प्रवाशांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या अपघातांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत. नोव्हेंबर २०२२ वर्षा मध्ये राहुरी सूतगिरण ते राहुरी कारखाना या परिसरात आठ दिवसात सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. या विषयास अनुसरून ३ डिसेंबर २०२२ रोजी रस्ता दुरुस्त कृती समिती अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने दशक्रिया विधी घालण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत संबधित प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिलेले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामाला देखील सुरवात करण्यात आलेली आहे.
परंतु डिसेंबर २०२२ पासून देश विदेशातून जागतिक प्रसिद्ध असलेले देवस्थान शिर्डी व शिंगणापूर या ठिकाणी भाविक येत असतात. या गर्दीच्या काळात नगर ते शिर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. याच दरम्यान अवजड वाहतुक करणारे साधने याच रस्त्यावरून वाहतूक करत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवजड वाहतूक करणाऱ्या साधनांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होवून जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर ते शिर्डी या रस्त्याचे दुरुस्तीचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून होणारे अपघात टाळण्याकामी सहकार्य करावे अशी मागणी केलेली होती.
या मागणीची दखल घेत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर-पुणे-सोलापुरकडून मनमाड कडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक ही कल्याण बायपास चौक-अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळदघाट- दूध डेअरी चौक- शेंडी बायपास- अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापुर- वैजापुर- येवला मार्गे जाईल. शनि शिंगणापुर-सोनई रोडवरून मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरुन जाईल. मनमाड-येवला शिर्डीकडून अहमदनगरमार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची अवजड वाहतुक पुणतांबा फाटा- झगडे फाटा (रा.म.मा.क्र. १६० ब)-झगडे फाटा- सिन्नर (रा.म.मा.क्र. १६०) सिन्नर- नांदूरशिंगोटे- संगमनेर- आळेफाटा (रा.म.मा.क्र.६०) मार्गे जाईल. मनमाड – येवलाकडुन अहमदनगर-सोलापुर-बीडकडे येणाऱ्या सर्व प्रकारची अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापुर-गंगापुर-कायगाव-प्रवरासंगम-शेंडी बायपास- विळदघाट-केडगाव बायपास मार्गे जाईल. लोणी- बाभळेश्वर-श्रीरामपुरकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक बाभळेश्वर- श्रीरामपुर- टाकळीभान- नेवासा मार्गे अहमदनगरकडे येईल.‌
या वाहतुक बदलातून ऊस वाहतुक करणारे वाहने (उदा. ट्रक, ट्रक्टर व अन्य वाहने) यांना वगळण्यात आले आहे. बस, अत्यावश्यक मालाची वाहतुक करणारी वाहने, रस्ता दुरुस्ती करीता आवश्यक वाहने स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नसल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button