अहमदनगर

मराठा कुणबी आरक्षणास विरोध करणे घटनाबाह्य – राजेंद्र कोंढरे

शिर्डी येथे मराठा महासंघाची बैठक संपन्न

शिर्डी – ओबीसी समाजातील काही अविवेकी नेत्यांच्या वक्त्यव्यामुळे मराठा अन् इतर समाजात तेढ निर्माण होत असून मराठा कुणबी आरक्षणास विरोध करणे घटना बाह्य असल्याचे परखड मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सभा व मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला.

अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले, त्यावेळी श्री. कोंढरे अध्यक्षपदावरून बोलत होते. राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, राष्ट्रीय खजिनदार प्रमोद जाधव, राष्ट्रीय चिटणीस गुलाब गायकवाड, युवा प्रतिनिधी आतिष गायकवाड, अमोल निकम, उत्तर महाराष्ट्र संघटक लालूशेठ दळवी, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकात बनकर, नाशिक महिला अध्यक्षा अस्मिता देशमाने, धाराशिव महिला अध्यक्षा रेखा लोमटे, युवक सरचिटणीस योगेश पाटील, मंगेश निकम, किशोर गिराम, अमोल पवार आदी उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेच्या आधारे निर्माण झालेला आरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी खटल्याच्या आधारे निर्माण झालेला राज्य मागासवर्ग आयोगाच्या तरतुदीच्या आधारे आरक्षण धोरण राबविले जाते. या दोन्ही तरतुदीचा आधार न घेता ज्यांनी ओबीसीतील अतिरिक्त आरक्षण अगोदरच बेकायदेशीर व्यापलेले आहे, त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास व कुणबी प्रमाणपत्रास विरोध करणे ही भुमिका घटनाबाह्य व कायद्याचा अवमान करणारी आहे. दोन्ही समाज घटकांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. समाजा समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. सोशल मीडियावरील अविवेकी तेढ वाढवणाऱ्या पोस्ट टाळल्या पाहिजेत. हे त्यांना स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार आहे, रोडमॅप जाहीर करावा. मराठा समाजाला यापुढे ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या तीन सूत्रावर आधारित क्रियाशील व्हावे लागेल.

एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेत ३० ते ५०% वाटा व स्थान असलेल्या मराठा समाजाला आज राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत ३% पर्यंत खाली येण्याची कारणे शोधून त्यावर ते स्थान पुन्हा मिळविण्यासाठी काम करावे लागेल. राज्याच्या विकासात प्रकल्पासाठी कवडीमोल दराने जमिनी घेतल्या. इथला इतिहास घडवताना देशाचे संरक्षण करताना ज्या समाजाने त्याग केला, आरक्षणाचे धोरण ज्यांनी निर्माण केले, त्या समाजातील दुर्बलांसाठी सर्व समाजाने उभे राहणे गरजेचे आहे.

मागील सभेचे प्रोसडींग संयुक्त चिटणीस गुलाब गायकवाड यांनी वाचले. जमा खर्च, हिशोबाचे वाचन सरचिटणीस प्रकाश देशमुख यांनी केले. यावेळी अनेक सभासदांनी सूचना व ठराव मांडले. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी तर आभार अतिष गायकवाड यांनी मानले.

या अधिवेशनास विशेष उपस्थिती म्हणून श्रीरामपूर जिल्हा संघर्ष कृती समितीचे राजेंद्र लांडगे व क्रांतीसेना, मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र कृषक समाज, महाराष्ट्र राज्य टी डीएफ व जिल्हा राष्ट्रवादीचे भागचंद यादवराव औताडे पाटील यांनी आपल्या संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा म्हणून उपस्थिती लावली. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले व सरचिटणीस रमेश बोरुडे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राहुरी तालुकाध्यक्ष दिनकर पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष ऋषिकेश पवार, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुजित ढोकचौळे, राहता तालुकाध्यक्ष रवीराज देसले, विलास वराळ, योगेश निकम, अनिकेत सदाफळ, सुमित निर्मल, अप्पासाहेब ढोकणे, ऋषिकेश भोसले, बापूसाहेब तनपुरे, विकी गायकवाड, सचिन मुजगुले, निलेश शेजवळ, बंटी नेरपगारे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button