कृषी

देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

राहुरी विद्यापीठ : देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म संकरीत गाईच्या माध्यमातून झाला आहे अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

अशी तयार झाली भ्रूण प्रत्यारोपण थारपारकर कालवड

प्रयोगशाळेमध्ये थारपारकर 133 नंबरची दातागाई वापरली असून तिची दूध उत्पादन क्षमता प्रतिवेत 3293 किलो आहे. तसेच दाता वळू म्हणून थारपारकर फेथफुल नावाचा वळू वापरला असून वळूच्या आईचे दूध उत्पादन प्रतिवेत 3005 किलो आहे व दुधातील स्निग्धांश 4.8% आहे. हा भ्रूण प्रयोगशाळेतून तयार करून सात दिवसानंतर देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेल्या PT 80 या संकरित गायीमध्ये प्रत्यारोपण केला आहे. प्रत्यारोपणाचे दिनांक 22 ऑक्टोबर, 2022 असून गाई दि. 17 जुलै, 2023 रोजी व्याली आहे. वासराचे जन्मता वजन 21 किलो आहे. सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे.

महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्यांच्या गोठयामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावरती वापरण्यास सुरुवात केली असून या प्रकल्पांतर्गत सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे अशी माहिती प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली.

सदर तंत्रज्ञान राहुरी सीमेन स्टेशन (एनडीडीबी) यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर व विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. सदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे तसेच राहुरी सीमेन स्टेशनचे डॉ. शिवकुमार पाटील हे काम करत आहेत.

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय?

उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता (Recepient) गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळवणे.

विद्यापीठासाठी अभिमानास्पद गोष्ट…

विद्यापीठामध्ये भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गाईंचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020 साली कार्यान्वित केला असून देशी गाईंचे जलद गतीने संवर्धन होण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान उपयोगाचे ठरणार आहे. गावठी अथवा संकारीत गाईंच्या माध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी गाईंच्या कालवडी तयार करून बदलत्या हवामानामध्ये तग धरणार्या व रोग प्रतिकारक क्षमता जास्त असणार्या देशी गाईंची संख्या वाढवून महाराष्ट्रात दुध उत्पादन वाढीस तसेच नैसर्गिक शेतीस मदत होणार आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पांतर्गत 20 गीर व साहिवाल या जातीच्या कालवडी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यापीठ डेअरी व शेतकर्यांच्या गोठ्यात तयार झालेल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत पहिल्या थारपारकर कालवडीचा जन्म झाला आहे.

_ डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

सदर प्रकल्प महाराष्ट्रातील गोपालकांसाठी अत्यंत महत्वाचा असून देशी गाईंच्या दुध उत्पादन क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास या संशोधन केंद्रामध्ये होत आहे. सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे. मे 2022 रोजी या संशोधन केंद्रावर देशी गाईंचे गोधन 2022 हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यादरम्यान ना. अजित पवार यांनी देशी गाईवरती संशोधन होण्यासाठी व शेतकर्यांना तांत्रिकदृष्ट्या निवासी प्रशिक्षण मिळण्यासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठ पुढील कार्यासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button