आरोग्य

दुषीत घाण पाण्यामुळे श्रीरामपूरकरांचे आरोग्य धोक्यात ; समाजवादी पार्टी आंदोलनाच्या पावित्र्यात

नळांद्वारे येणाऱ्या घाण पाण्याची जर नगर पालिका प्रशासन दखल नाही घेणार !
तर हेच घाण पाणी बाटलीत बंद करुन नगर पालिका अधिकाऱ्यांना पिण्यास देणार !! 
अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर नगर पालिकेमार्फत पिण्याच्या पाण्याचा घराघरात पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांद्वारे दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्यधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, येत्या आठ दिवसांत नळाद्वारे येत असलेले दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा योग्य बंदोबस्त न केला गेल्यास समाजवादी पार्टीतर्फे नगर पालिकेसमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात पूढे असेही म्हटले आहे की, सदरील दुर्गंधीयुक्त घाण पाणी पिण्यात येऊन अनेक नागरीकांना जुलाब, वांत्या आणि थंडीतापाच्या साथीने ग्रासले आहे. यात लहान बालकांना मोठा फटका बसत असून रोजच दवाखाने गच्च भरल्याचे निदर्शनास येत आहे, तथा सदरील पाणी पुरवठा करणाऱ्या काही जलवाहिन्या या गटारीच्या कडेने गेल्या असल्याने बहुतांश ठिकाणी चक्क गटारीचे घाण पाणी मिश्रीत होऊन नळाद्वारे पिण्यास येत आहे. याप्रकरणी परिसरातील नागरीकांनी अनेकवेळा नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही नगर पालिका प्रशासनाने दखल घेणे तर दुरच उलट पाणी पिण्यास योग्य असल्याचा हवाला देत स्वतःचीच वाह वाह करण्यात धन्यता मानत आहे. यावरुन दिसून येते की सदरील ज्वलंत आणि गंभीर प्रश्नी नगर पालिका किती कमालीच्या उदासिनतेची भुमिका बाळगत आहे, म्हणून श्रीरामपूर शहरातील नागरीकांना नाविलाजास्तव सदरील दुषीत आणि दुर्गंधीयुक्त घाण पाणी पिणे भाग पडत आहे.
शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरात संभाव्य भविष्य काळात प्रचंड प्रमाणात रोगराईची साथ पसरण्याची शक्यता ही नाकारली जाऊ शकत नाही. ज्या ज्या नागरीकांच्या नळांना दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असेल त्यांनी सदरील पाणी बाटलीत भरुन ठेवावे. जर नगर पालिका प्रशासनाने वेळीच याची दखल घेतली नाही तर, बाटलीतील हेच पाणी आपण त्यांना पिण्यासाठी नगर पालिकेत घेऊन जाऊ आणि मिनरल तथा फिल्टर पाणी पिणाऱ्या नगर पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना पिण्यास देऊन त्यांची सेवा करु, म्हणजे त्यांनाही सदरील पाणी पिताना पाणी खरोखरच योग्य की अयोग्य याचे व्यवस्थित निरिक्षण/परिक्षण करता येऊ शकेल, असेही जोयफ जमादार यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगीतले.
तसेच येत्या आठ दिवसांत सदरील नळाद्वारे येत असलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा योग्य बंदोबस्त न केला गेल्यास श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाविरुद्ध तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडून आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले असून यापासून उद्भवलेल्या बऱ्या वा वाईट परिणामास संबंधित नगर पालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
सदरील निवेदन देताना जोयफ जमादार, आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण, इमरान शेख, अब्दुल सैय्यद, मतीन शेख, अफरोज शाह, बादल सिंग जूनी, अरबाज़ कुरैशी, दानिश शाह, अज़हर जहागीरदार, सहेजाद शेख, मकसूद मिर्ज़ा, रवी बोरसे, सुल्तान शेख, शाहरुख पठाण, राजू वेल्डर, मुस्तकीम मिर्ज़ा आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button