अहमदनगर

माजी आ. मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली सुरु केलेले रास्तारोको आंदोलन मागे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदिरगाव- माळेवाडी- श्रीक्षेत्र सराला बेट, रामपूर ते निमगाव खैरी, रामपूर ते नाऊर तसेच उंदिरगाव ते नाऊर या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या सोमवार (ता.31) पासून सुरु करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन गुजरे यांनी दिल्यानंतर याप्रश्नी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली लोेकसेवा विकास आघाडीने सुरु केलेले रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील उंदिरगाव- माळेवाडी ते श्रीक्षेत्र सराला बेट, रामपूर ते निमगाव खैरी, रामपूर ते नाऊर तसेच उंदिरगाव ते नाऊर या रस्त्यांची दुर्दशा झाली असून सदर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब सुरु करावे, यासाठी उंदिरगाव, माळेवाडी, महांकाळ वाडगाव सराला, गोवर्धन, रामपूर, नाऊर येथील लोकसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली गुरुवारी ( दि . २७ ) हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले. नमूद केलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. जागोजागी खड्डे पडल्याने लहानमोठे अपघात होत आहेत. आता पाऊस उघडला असल्याने सदर रस्त्यांची कामे सुरु करणेबाबत आश्वासन मिळाल्याशिवाय रास्तारोको आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल, अशी भूमिका श्री.मुरकुटे यांनी घेतली.
यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री.गुजरे यांनी संबंधित रस्त्यांची डागडुजीची कामे येत्या सोमवार पासून सुरु करण्याचे आश्वासन दिले. यासाठी तीन टिम तयार करुन तिन्ही रस्त्यांची खड्डे बुजवून प्राथमिक डागडुजी केली जाईल. तसेच शासनाने दिलेली स्थगिती उठल्याबरोबर या रस्त्यांच्या मजबुतीकरण व नुतनीकरणाची कामे केली जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सदरचे रास्तारोको आंदोलन मागे घेतले. यावेळी ‘अशोक’ चे माजी चेअरमन सुरेश गलांडे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याचे संचालक विरेश गलांडे, उंदिरगावचे सरपंच सुभाष बोधक, कचरु औताडे, हरेगावचे माजी सरपंच दिलीप त्रिभूवन यांची भाषणे झाली. संबंधितांनी मतदार संघाचे खासदार व आमदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत टीकेची झोड उठविली. खासदार व आमदार रस्त्यांची कोटी कोटीची कामे मंजूर असल्याची पत्रकबाजी करतात. मग प्रत्यक्षात सदरची कामे का होत नाहीत, असा सवाल या वक्त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवैध वाळू वाहतूकीमुळे दुर्दशा झाली असून याकडे खासदार तसेच आमदार डोळेझाक करीत असल्याचा आरोपही या वक्त्यांनी केला.
आंदोलनात लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, शिरसगावचे सरपंच आबासाहेब गवारे, अशोक कारखान्याचे संचालक आदिनाथ झुराळे, सोपानराव नाईक, दादासाहेब खर्डे, मंजाबापू नाईक, बाळासाहेब नाईक, चेतन त्रिभूवन, सुभाष शिंदे, लक्ष्मण सरोदे, राजेंद्र गिर्‍हे, युवराज भालदंड, प्रमोद भालदंड, बाळासाहेब आढाव, बाबासाहेब नाईक, पांडूरंग राऊत, विजय ताके, रेवजी भालदंड, अशोक बांद्रे, बबनराव नाईक, शितल गलांडे, अशोक गुळवे, रामेश्वर बांद्रे, रमेश गलांडे, राजेंद्र नाईक, भरत वमने, निलेश जाधव, अनिल वमने, गोकुळ औताडे, रामभाऊ जगताप, दिनकर जगताप, गोरक्षनाथ जगताप, वाल्मिक शिंदे, वाल्मिक बडाख, सुधाकर ससाणे, सोन्याबापू शिंदे, कचरु वाघचौरे, कचरु वाघ, देविदास वमने, रामभाऊ औताडे, सुनिल औताडे, विष्णुपंत रसाळ, रमेश औताडे, रामदास पवार यांचेसह कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
त्यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या आंदोलन प्रसंगी शहर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्न माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी लक्ष घातल्याने सुटला, याबद्दल उंदिरगाव, माळेवाडी, महांकाळवाडगाव, सराला, गोवर्धन, रामपूर, नाऊर येथील ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.

Related Articles

Back to top button