कृषी

ज्युट व तंतुमय पिके पर्यावरणाच्या दृष्टीने अतिमहत्वाचे- सहाय्यक महासंचालक डॉ. आर.के. सिंग

राहुरी विद्यापीठ : भारत हा ज्युट उत्पादनात जगामध्ये एक नंबरवर आहे. जगातील एकुण 92 टक्के ज्युट उत्पादन हे भारत व बांगलादेश या दोन देशात होते. एक हेक्टरवरील ज्युट पीक हे वातावरणातील 15 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषूण घेते. त्याचबरोबर नापीक जमिनीमध्येसुध्दा ज्युट व धागावर्गीय पिके चांगले उत्पादन देतात. येणार्या काळात प्लॅस्टीकला सर्वोत्तम पर्याय म्हणुन ज्युटकडे पाहिले जाते. ज्युट व इतर तंतुमय पिकांपासून मिळणार्या फायबरची स्ट्रेन्थ व नैसर्गिक पध्दतीने विघटन होण्याची क्षमता यामुळे ते पर्यावरणपूरक ठरते. ज्युटच्या पानांमध्ये पौष्टीकता जास्त असल्यामुळे परदेशात त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशा दृष्टीकोनातून ज्युट व तत्सम तंतुमय पिके पर्यावरणाच्या दृष्टीकोनातुन तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून अति महत्वाची पिके असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेच्या नगदी पिके विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर. के. सिंग यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 23 व 24 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत ज्युट व तत्सम तंतुमय पिकांवरील 34 व्या वार्षिक कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व अखिल भारतीय ज्युट व तत्सम तंतुमय पिके संशोधन प्रकल्प यांच्या विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेच्या नगदी पिके विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर.के. सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. या प्रसंगी व्यासपीठावर बराकपूर, कोलकता येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे ज्युट व तत्सम तंतुमय पिकांच्या केंद्रिय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. कार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, बराकपूर, कोलकता येथील ज्युट व तत्सम तंतुमय पिकांच्या केंद्रीय संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. मित्रा, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, या वार्षिक कार्यशाळेचे आयोजक तथा सहयोगी संशोधन संचालक डॉ राजेंद्र वाघ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित ज्युट व तत्सम तंतुमय पिकांच्या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. डी. व्ही. देशमुख उपस्थित होते.
डॉ. जी. कार यांनी यावेळी तंतुमय पिकांचे सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ज्युट व इतर तत्सम तंतुमय पिकांचे योगदान भारतीय शेतीसाठी तसेच आत्मनिर्भर भारत व स्वच्छ भारत या भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांमध्ये खूप महत्त्वाचे असून प्लास्टिकला पर्याय म्हणून या तंतुमय पदार्थांपासून मिळणार्या फायबरचा वापर मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मल्चिंग करिता प्लास्टिकचा वापर केला जातो. या तंतुमय पदार्थांपासून मिळणार्या फायबरचा उपयोग या मल्चिंगसाठी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणार्या प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकेल तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. डॉ. सुनील गोरंटीवार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की ज्युट व तंतुमय पिकांच्या फायबरमध्ये फार मोठी स्ट्रेंथ असून ज्युट व इतर तंतुमय पिकांच्यापासून मिळणारे फायबर हे नैसर्गिक बायोडिग्रेडेबल होणारे असून पर्यावरणाचे आरोग्य जपण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. यावेळी विविध घडीपत्रिका, पुस्तिका व वार्षिक अहवालांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. आर. एस. वाघ यांनी तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनाली उबाळे व रोहिणी पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, ओरीसा, तामिळनाडू, आसाम व महाराष्ट्र अशा नऊ राज्यातील 13 संशोधन केंद्रांमधुन 50 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ तसेच विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button